दुष्काळग्रस्तांऐवजी साखरसम्राटांना मदत करणाऱ्या राज्य सरकारवर राज ठाकरेंचा कुंचल्यांतून निशाणा   

0
751

मुंबई, दि. १८ (पीसीबी) –  यंदा पुरेशा पावसाअभावी नोव्हेंबरपासूनच महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत  महाराष्ट्राला मदत करण्याऐवजी सरकार आजारी साखर कारखान्यांना आर्थिक मदत देत असल्याच्या वृत्ताचा दाखला देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साखर सम्राट आणि फडणवीस सरकारला आपल्या कुंचल्यांतून  फटकारे मारले आहेत.  

या व्यंगचित्रात एक तहानलेला मरणासन्न व्यक्ती पाण्यासाठी सरकारकडे विनंती करत असल्याचे दाखवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यावर ओरडत असून कोपऱ्यात जाऊन बसण्याच्या सूचना करत आहेत. मुख्यमंत्र्यांना त्यांनी संवेदनशील सरकार अशी उपमा दिली आहे. ‘वा.. जा बघू, तिथे कोपऱ्यात जाऊन बस ! सारखी आपली पिरपिर पिरपिर, पाणी द्या पाणी द्या ! याला जरा शांतपणे गिळू देशील की नाही !,’ असा साखर कारखान्यांकडे इशारा करत  असल्याचे व्यंगचित्रात  दाखवले आहे.

व्यंगचित्रात आजारी साखर कारखाने म्हणून एका व्यक्तीला दाखवले असून त्याच्यासमोर नोटांचे ढिगारे लागल्याचे दाखवले. हा व्यक्ती हाताची घडी घालून पैशांकडे निश्चिंतपणे पाहत  आहे.  ‘महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना येथील आजारी साखर कारखान्यांना ५५० कोटी रुपयांची मदत करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे! – बातमी’, असा उल्लेख राज  यांनी आपल्या व्यंगचित्रात केला आहे.