दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, तिच्यावर बलात्कार करुन हत्या केल्याचा नारायण राणे यांचा आरोप

0
447

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. “सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा,” असे नारायण राणे म्हणाले. “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय,” असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

“सुशांत सिंह राजपूत प्रकरण हे सध्या गाजत आहे. सरकार या विषयाकडे न पाहता हा विषय दुर्लक्षित कसा करता येईल याचा प्रयत्न करत आहे. सुशांतची आत्महत्या नाही, तर हत्या करण्यात आली आहे. अनेक तज्ज्ञ तेच सांगत आहेत. याप्रकरणी राज्य सरकारची चौकशी ज्या दिशेला चालली आहे, त्यामधून या सरकारला कुणाला तरी वाचवायचं आहे हे दिसत आहे. सुशांतची हत्या झाली, पण याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्यापही एफआयआर दाखल केलेला नाही,” असे नारायण राणे म्हणाले.

“बिहारमध्ये याबाबत एफआयआर दाखल झाला. पण इथे झाला नाही. 50 दिवस झाले, आरोपी कोण आहे? हे समोर आलेलं नाही. जगात मुंबई पोलिसांची ख्याती आहे, नामलौकिक आहे. पण 50 दिवसात सुशांतसोबत त्यादिवशी रात्री पार्टीला कोण होतं? त्यांना अटक का करत नाही? त्याला रुग्णालयात नेणारा माणूस दोन तासांनी येतो आणि सांगतो की, मी लटकताना पाहिलंय. तो ठराविक रुग्णवाहिकाच का बोलवतो? ठराविक रुग्णालयात का नेतो? सर्व संशयास्पद घटना आहेत,” असेही राणेंनी यावेळी सांगितले.

“सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? 13 तारखेला ते तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमेऱ्यात त्यांचा ताफा वगैरे ते येणार नाहीत. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे ते, ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येतोय, अधिकारी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नाही,” असेही नारायण राणे म्हणाले.

रिया चक्रवर्ती ही सुशांतची मैत्रिण, त्याच्यासोबत राहायची. ती 9 तारखेला त्याला सोडून गेली. या प्रकरणातील प्रमुख व्यक्ती तीन-चार दिवसांपासून गायब झाली आहे. पोलिसांना याबाबत माहिती नाही. मुंबई पोलीस अज्ञात असतील, असं मला वाटत नाही. मंत्री असो किंवा कुणीही असो, निरपराध मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलेलं नाही. रिया चक्रवर्तीला शोधून तिच्याकडून अधिकची माहिती घेणं आवश्यक आहे. सुशांतच्या केसमध्ये जे लोक वाचवायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी गप्प बसावं. नाहीतर त्यांच्याही कुंडल्या बाहेर काढल्या जातील, असे नारायण राणेंनी सांगितले.

काम न करणं हेच धोरण या सरकारचं आहे. आज कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. मुंबईत 6 हजार पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तरी सरकारला काही वाटत नाही. साडेसहा हजार लोकांचा मृत्यू? हा छोटा आकडा आहे. सरकार यावर का बोलत नाही? निरपराध लोकांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलेलं नाही, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली.

मंत्रालय कायमचं बंद करा, तिथे कुणी येत नाही
“सरकार अस्तित्वात आहे असं वाटतही नाही. मुंबईत पाऊस फक्त आज पाऊस पडतोय असं नाही. दरवर्षी मुंबईत पाऊस पडतो. दरवर्षी पावसात एक-दोन वेळा मुंबई बंद पडते. पण सकाळीच पाऊस पडला म्हणून मंत्रालयाला सुट्टी? मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, कायमचं मंत्रालय बंद करा ना नाहीतरी कुणी येतंच नाही. फक्त अधिकाऱ्यांना बसण्यासाठी मंत्रालय का चालू ठेवायचं? का एवढा खर्च करायचा? एकतर वेळेवर पगार देत नाहीत. कर्मचाऱ्यांना कधी 75 टक्के, 50 टक्के पैसे, तर कधी पैसे मिळत नाही. कर्मचाऱ्यांची आज अशी परिस्थिती आहे.”
“सामनातून पत्रकार परिषदा घेता. त्यापेक्षा कोरोनाच्या मृतांची संख्या कमी करुन दाखवा. बाधित लोकांना ठणठणीत करुन दाखवा. यावर मुख्यमंत्री आणि त्यांची माणसं का बोलत नाहीत? मुख्यमंत्र्यांची माणसं, नेते, आमदार, खासदार किंवा विभागप्रमुख कुणीच काही बोलत नाहीत. कोरोना मृतांची संख्या कमी करायला हवी. त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. एकतर महाराष्ट्रात सव्वा लाखापेक्षा जास्त स्टाफ कमी आहे. त्यात सुट्ट्या, काम बंद, कसा कारभार करतात देव जाणे,” असे नारायण राणे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत अज्ञान दाखवलं
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरच काम करायचं सांगितलं आहे. इकडेतिकडे फिरलं नाहीतर अधिकारी काय काम करत आहेत, ते कळणारच नाही. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत आपलं अज्ञान लोकांना दाखवून दिलं. कुठला प्रश्न, उत्तर काय, काहीच संबंध नाही. असा मुख्यमंत्री देशाच्या कुठल्याही राज्यात नसेल.”

“सध्या भयावह परिस्थिती आहे. कोरोनामुळे, या सरकारमुळे शेक्षणिक, रोजगाराबाबत समस्या निर्माण झाली आहे. देशात आढळणाऱ्या रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण तर महाराष्ट्रातील असतात. मृतांची संख्याही तशीच असते. देशातील कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रातील रुग्णसंख्याच्या मृत्यू एक नंबर आहे,” असेही नारायण राणे म्हणाले.