मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – दिवाळीनंतर राज्यातील गावागावातून‘मराठा संवाद यात्रा’काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर मुंबईत पुन्हा मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आज (बुधवार) मराठा क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीने दिली आहे.
‘मराठा संवाद यात्रा’१६ ते २६ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ‘मराठा संवाद यात्रा’ मुंबईत सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन वातावरण गरम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मराठा किंवा मराठा क्रांती मोर्चा नावाने राजकीय पक्ष स्थापन केल्यास समाज त्यांना धडा शिकवेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा नावाचा कोणताही पक्ष स्थापन करून देणार नाही. सरकार ‘फोडा व झोडा’नितीचे राजकारण करत आहे. मराठा समाज हे राजकारण झुगारून लावेल, असे मराठा कोअर कमिटीने म्हटले आहे.