पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – दिल्लीमध्ये शिवसेनेच्या खासदारांचा दरारा असल्याने आम्हाला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदीही रस्ता बदलतात. आम्ही फाटके आहोत, त्यामुळे भलेभले आम्हाला टरकून असतात, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (शनिवार) येथे केले.
पिंपरीत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लिहीलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राऊत बोलत होते. यावेळी खासदारश्रीरंग बारणे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक रामचंद्र देखणे, शहराध्यक्ष योगेश बाबर, गजानन चिंचवडे, सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले की, लाटेत वाहून जात मतदारांनी अनेक दुर्जनांना निवडून दिल्याने लोकशाहीचे मंदिर आता राहिलेले नाही. त्यामुळे सध्याच्या लाटेत वाहून जाणे आता मतदारांनी थांबवले पाहिजे, असे सांगून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पडलेला उमेदवार आमदार, खासदार झाला. नावावर गुन्हे असलेले लोक संसदेत आले, त्यामुळे त्या मंदिराचे पावित्र्य उरलेले नाही, अशी खंत राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.