दिल्लीत पकडलेल्या दहशतवाद्यांपैकी ‘एक’ जण धारावीतील. गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक; एटीएसचे अधिकारीही राहणार उपस्थित

0
309

– यावेळी ‘हे’ शहर होत टार्गेट

मुंबई, दि.१५ (पीसीबी) : दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. वळसे-पाटील यांनी तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला एटीएसचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे रेल्वेनेही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या बैठकीबाबत स्वत: माहिती दिली आहे. दिल्लीत सहा अतिरेक्यांना अटक करण्यात आली. ही संवेदनशील घटना आहे. देशाच्या स्तरावरील ही घटना आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, या बैठकीतील कायदेशीर माहिती घेतल्यानंतरच त्यावर अधिक भाष्य करता येईल. आताच काही बोलणं योग्य होणार नाही, असं दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं. तसेच या बैठकीला पोलिसांच्या सर्व युनिटचे बडे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

दिल्लीत पकडलेल्या दहशतवाद्यांचा मुंबई लोकलमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा प्लॅन होता अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन सतर्क झालं आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे पोलिसांची एक महत्त्वाची बैठक रेल्वे मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. रेल्वे आयुक्त कैसर खालिद यांच्यासह डीआरएमचे मोठे अधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत रेल्वेच्या सुरक्षेवरही चर्चा होणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.दरम्यान, ज्या सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली त्यातील एक जण हा धारावीतील रहिवाशी आहे. जान मोहम्ममद शेख असं या आरोपीचं नाव आहे. शेखला अटक करण्यात आल्यानंतर धारावी पोलिसांनी रात्रीच त्याची पत्नी आणि दोन मुलींना ताब्यात घेतलं. जान मोहम्मद शेख कुणाकुणाच्या संपर्कात होता, घरी कोण कोण यायचे, त्यांची नावं काय? घरी येणाऱ्या लोकांना ओळखत होता का? ही लोकं कुठली राहणारी होती? आदी सर्व माहिती त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यातील दोन दहशतवादी डी- गँगशी संबंधित असल्याचीही माहिती मिळतेय. सध्या देशात सणांची धूम आहे. गणेशोत्सव, नवरात्री या सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची तयारी होती.

दिल्ली पोलीस तसे एटीएसने देशातील विविध भागातून एकूण सहा जणांना अटक केले आहे. यामध्ये महाराष्ट्रात राहणाऱ्या एकाला राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर दोघांना दिली तेसच तीन जणांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलंय. या संशयितांच्या टार्गेटवर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश तसेच दिल्लीमधील काही ठिकाणं होती.