Home Maharashtra दिल्लीतील दंगल म्हणजे केंद्र सरकारचे अपयश – डॉ. अमोल कोल्हे
जुन्नर, दि.२८ (पीसीबी) – दिल्लीतील हिंसाचारावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्य फैरीही रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्लीतील हिंसाचारावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी या परिस्थितीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार धरले आहे. गुरूवारी त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
“दिल्लीतील दंगल म्हणजे केंद्र सरकारचे अपयश आहे. आपल्या धोरणांना जर विरोध होत असेल तर त्यातून मार्ग काढण्याचे काम हे केंद्र सरकारचे आहे. या घटनेची त्यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांनी आपला राजीनामा द्यावा,” अशी मागणी कोल्हे यांनी केली.
पुढे म्हणाले, दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये शनिवारी हिंसेची ठिणगी पडली त्यानंतर हा हिंसाचार वाढतच गेला. तब्बल चार दिवस ईशान्य दिल्लीच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर जोळपोळ करण्यात आली. यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचारावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.