दापोडीत पुर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने वार करुन निर्घृण खून

0
2006

दापोडी, दि. ३० (पीसीबी) –  पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन पाच जणांच्या टोळक्यांनी एका १९ वर्षीय तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून केला. तर दोन महिलांना देखील जखमी केले. ही धक्कादायक घटना आज (रविवार) पहाटे दोनच्या सुमारास दापोडीतील जयभीमनगरमध्ये घडली.

अल्विन रवी राजगोपाल (वय १९ , रा. कैलास जाधव चाळ, जयभीमनगर, दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  तर क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल अशी जखमी झालेल्या दोघा महिलांची नावे आहेत. याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार, अभिषेक राजू चव्हाण (वय २६), रुपेश दिलीप संकपाळ (वय २०), राहुल वीर उर्फ पप्प्या (वय २०), निखील (पूर्ण नाव माहित नाही. वय २१) सनी गजभीव (वय २०, सर्व रा. जयभीमनगर, दापोडी) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन रविवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास पाचही आरोपींनी कोयत्याने अल्विन याच्यावर प्राणघात हल्ला केला. हे पाहून क्लेरा आणि पुष्पा भांडणे सोडवण्यासाठी मधे आल्या मात्र आरोपींनी त्यांना देखील मारहाण करत जखमी केले. या हल्ल्यात अल्विन याच्या डोक्या, हातावर आणि मानेवर गंभीर वार झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.