Maharashtra

दानवेंचे मानसिक संतुलन बिघडले- अशोक चव्हाण

By PCB Author

September 16, 2018

नाशिक, दि. १६ (पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रसेमुळे पेट्रोल दरवाढ, राफेल विमान घोटाळयात काँग्रेस नेतेच अडकले, जनसंघर्ष यात्रेचा भाजपला फायदा’ या केलेल्या विधानाचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला. राफेल प्रकरण दानवे यांच्या डोक्याच्या पलीकडचे आहे. दानवे यांना रोज जावई शोध कुठून लावतात तेच कळत नाही. त्यांनी केवळ आपला लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष द्यावे, असे सांगत राफेल आहे की, रायफल हेच दानवेना समजत नसल्याचा टोला लगावत, विरोधकांच्या आरोपांमुळे त्यांचे मानसिक संतुल बिघडल्याची टीका त्यांनी केली आहे. 

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त नाशिक काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप सरकारच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रापासून संघर्ष यात्रेला सुरूवात केली, महागाई, इंधन दरवाढ याची उत्तर सरकारने द्यायला पाहिजे. मात्र सरकारचे यावर मौन साधले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देण्यासाठी काढलेल्या शासन आदेश रद्द करण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. यात शेतकरी व व्यापाऱ्यांना मारायचे धोरण सरकारचे आहे, असा आरोप करत किमान आधारभूत किंमत सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.