Maharashtra

दहीहंडी दरम्यान न्यायालयीन आदेशाचा भंग केल्याने राज्य सरकारविरोधात याचिका दाखल

By PCB Author

September 06, 2018

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – दहीहंडी उत्सवाबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा सर्वत्र सर्रासपणे भंग झाल्याचा आरोप करत एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारच्याविरोधात न्यायालय अवमान याचिका दाखल केली आहे.

दहीहंडीखाली मॅट, मॅट्रेससारखी सुविधा, सर्व गोविंदांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट असे साहित्य पुरवण्याबरोबरच गोविंदांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, अशी लेखी हमी खुद्द राज्य सरकारनेच दिलेली असताना आणि त्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले असताना यंदाच्या गोपाळकाला उत्सवात जागोजागी आदेशभंग झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळेच जनहित याचिकादार अॅड. स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात सरकारविरोधात ही न्यायालय अवमानाची याचिका दाखल केली आहे. यामुळे राज्य सरकारवर मुंबई उच्च न्यायालय काय कारवाई करणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.