दहीहंडीची पाचशे रुपये वर्गणी न दिल्याने दुचाकी पेटवली; चार जणांना अटक

0
948

पुणे, दि. २ (पीसीबी) – दहीहंडीची ५०० रुपये वर्गणी दिली नाही म्हणून चार जणांच्या टोळक्यांनी एका फोटोग्राफीचा व्यवसाय करणाऱ्या इसमाच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील अंबेगाव खूर्द येथे शनिवारी (दि.१) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याप्रकरणी प्रफुल चंद्रकांत थोरात (वय २०, रा. अश्विनी विहार, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार, दत्ता विजय शिंदे, ओमकार संदीप कांबळे, दत्ता राहुल कदम आणि सुमित राजू अहिवळे  (सर्व रा. सच्चाई माता, कात्रज) या चार जणांना अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल थोरात त्याचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. दत्ता विजय शिंदे, ओमकार संदीप कांबळे,दत्ता राहुल कदम आणि सुमित राजू अहिवळे या चौघांनी प्रफुल यास दहीहंडीसाठी ५०० रुपये वर्गणी मागितली. या वर्गणीवरून त्यांच्यामध्ये वाद झाला. प्रफुलने वर्गणी न दिल्याचा राग मनात धरून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी  दत्ता शिंदे आणि त्याच्या अन्य मित्रांनी पृथ्वीराज अपार्टमेंटमधील पार्किंगमध्ये प्रफुल थोरात याच्या गाडीवर पेट्रोल टाकून जाळून टाकली.  या चौघांनाही अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.