दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करा – विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी

0
284

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी चिंचव़ड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे.

आपल्या निवेदनात काटे म्हणतात, पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसोदिवस वाढतच चालला आहे. शहरात आज अखेर ४,७७४ सकारात्मक कोरोना बाधित सापडले. सुमारे १,८५७ कोरोना बाधितांवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. रोज ३०० ते ४०० च्या पटीत कोरोनाबाधित सापडत आहेत. काल शहरात उच्चांकी म्हणजे ५७३ कोरोना बाधित सापडले. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे. जुलै – ऑगस्ट मध्ये सुध्दा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढणार आहे, असे आरोग्य विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी सरकारी तसेच खाजगी रुग्णानलयांमध्ये आताच बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर शहरातील खाजगी तसेच सरकारी यंत्रणांवर अतिरीक्त ताण येऊन शहरातील रुग्णांना वैद्यकीय उपचार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मर्यादेत ठेवण्याचे अवघड आव्हान वैद्यकीय यंत्रणेवर आहे.

लॉक डाऊन शिथिल केल्यामुळे नागरीकांची वर्दळ वाढून शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे काही नगरसदस्यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामध्ये दुर्दैवाने राष्ट्रवादीचे नगरसदस्य दत्ता (काका) साने यांचे निधन झाले आहे. तसेच मनपाच्या २५–३० कर्मचारी- अधिकारा-यांना कोरोनाची लागण झालेली आहे. आपणांस देखील होम क्वारांटाईन व्हावे लागले होते. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात काही दिवस कडक संचारबंदी लागू करण्याची अत्यंत गरज आहे. अन्यथा शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची शक्यता जास्त आहे. सध्यस्थितीमध्ये नवी मुंबई, ठाणे. कल्याण,डोंबवली, पनवेल इत्यादी शहरांनीसुध्दा कडक संचारबंदी लागू केली आहे,त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात सुध्दा कडक संचारबंदी लागू करण्याची आवश्यकता आहे, असे काटे यांनी सुचविले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना संसर्गांचा वाढता वेग लक्षात घेता व कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ज्याप्रमाणे सुरवातीला मार्च महिन्यात संचारबंदी लागू केली होती त्याप्रमाणे १० दिवस कडक संचारबंदी लागू करण्यात यावी. यामुळे नागरीकांवर निर्बंध येऊन कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होण्यास मदत होईल व शहरातील कोरोना संसर्गांचा वेग मंदावेल आणि शहरातील वैद्यकीय यंत्रणेवर अतिरीक्त ताण येणार नाही, असे काटे यांनी निवेदनात म्हटले आहे.