दहावीच्या विद्यार्थांना तोंडी परीक्षेचे गुण देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे आदेश – आदित्य ठाकरे

0
380

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – अकरावी प्रवेशावरुन निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबाबत माहिती देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही दहावीमधील विद्यार्थ्यांच्या इंटर्नल गुणांबाबत आणि अकवारी प्रवेशाबाबत विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा इंटर्नल मार्क (तोंडी परीक्षेचे गुण) सुरू करण्यात यावे, यासंदर्भात आदेश दिले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, इंटर्नलच्या गुणांचा खूप मोठा परिणाम होतो. काल मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यासंदर्भात तसे आदेश दिले आहेत. तसेच यंदा अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंटर्नलच्या गुणांमुळे नुकसान होऊ नये, यासाठी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी तुकडी करावी, अशी मागणीदेखील आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. त्यासंदर्भात विचार सुरु आहे.

आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, इंटर्नलच्या गुणांअभावी यंदा राज्याचा निकाल कमी लागला आहे. त्यामुळे एस. एस. सी. बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंटर्नल गुण सुरु करावे, ही मागणी मांडली आहे.