दक्षिण मुंबईमधून लोकसभेची निवडणूक लढवणार; रामदास आठवलेंची घोषणा

0
876

पुणे, दि. १४ (पीसीबी) – दक्षिण मुंबई मतदारसंघातून आपण लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत, अशी घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आज (रविवार) पत्रकार परिषदेत केली. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचा खासदार आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपची युती झाल्यास शिवसेना ही जागा माझ्यासाठी सोडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

युतीने दक्षिण मुंबई आणि साताऱ्याची जागा रिपाइंसाठी सोडावी, अशी जाहीर मागणी यावेळी आठवले यांनी केली आहे. तसेच उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना तिकीट देऊ आणि निवडून आणू. याबाबत उदयनराजेंशी बोलणार होतो. मात्र, ते सध्या दिल्लीत असल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा होऊ शकली नाही, असेही यावेळी ते म्हणाले.

आठवले म्हणाले की, मिटूबाबत अनेक व्यक्तींवर आरोपी केले जात आहेत. दोषींवर कारवाई झाली पाहिजे मात्र, ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी तक्रार करण्याची आवश्यकता होती. केवळ एखाद्याला फसवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये. नाना पाटेकर जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे ते यावेळी म्हणाले.