दंगलीबाबत माहिती असल्यास पोलिसांना कळवा; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

0
582

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – आता राम मंदिरावरुन देशात कुठेही दंगली होणार नाहीत. जर कोणाला याबाबत काही माहिती असेल, तर त्यांनी पोलिसांना कळवावे, असे आवाहन करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. राम मंदिरावरुन देशात दंगली घडवल्या जाणार आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया  दिली.  

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीसारख्या लोकांना हाताशी घेऊन देशात दंगली घडवण्याबाबत बोलणी सुरू आहेत, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर  संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राम मंदिरावरुन आता काही दंगल होणार नाही. कारण हा मुद्दा आता केवळ मंदिरापुरताच उरला आहे. याबाबत कुणाला काही माहिती असेल, तर त्यांनी पोलिसांनी कळवावे, असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजप आणि एमआयएम एकच असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे आणि सचिन सावंत यांनी करून राज ठाकरे यांचे समर्थन केले आहे.