Maharashtra

थकलेले साथीदार एकमेकांचा आधार बनू शकतात; मोदींचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

By PCB Author

October 13, 2019

जळगाव, दि. १३ (पीसीबी) –  थकलेले साथीदार एकमेकांचा आधार बनू शकतात, पण महाराष्ट्राची स्वप्ने आणि येथील तरुणांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचे माध्यम होऊ शकत नाहीत, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून टोला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (रविवार) जळगावमध्ये प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शरद पवार यांच्यावर  हल्ला चढवला.

नरेंद्र मोदी म्हणाले की,  हिंमत असेल तर विरोधकांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोदी सरकारने हटवलेले कलम ३७० पुन्हा लागू करून दाखवावे. विरोधकांनी नकराश्रू ढाळणे बंद करावे. लोकांना ते मूर्ख बनवत आहेत. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी कलम ३७० पुन्हा लागू करावे आणि तसे करण्याचा प्रयत्न केला. तर ते वाचतील का? त्यांचे राजकीय अस्तित्व राहील काय? असे मोदी म्हणाले. तुमच्यात हिंमत असेल तर तिहेरी तलाक पुन्हा लागू करून दाखवा, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना केले.