Maharashtra

‘त्या’ ८०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू मुळेच; प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट

By PCB Author

January 11, 2021

परभणी,दि.११(पीसीबी) – परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. मुंगळीकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलेलं असतानाच परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी ८०० कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली. तो बचत गटाच्यावतीने चालवला जातो. पोल्ट्री फॉर्ममध्ये ८००० हजार कोंबड्या असून, त्यापैकी ८०० कोंबड्या मरण पावल्या आहेत.

दरम्यान कोंबड्या मरण पावल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व मारण्याचे आदेश देण्यात आले असून, दहा किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.