‘त्या’ विधानावर शरद पवारांचे घूमजाव; सल्ला नव्हे, केंद्राच्या धोरणाला संमती दिली

0
900

पुणे, दि. १८ (पीसीबी) – पुलवामा  हल्ल्यानंतर बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर  हल्ला करण्याचा सल्ला मीच दिला होता. हा माझ्या विधानाचा  विपर्यास करण्यात आला आहे. दिल्लीतील  सर्वपक्षीय बैठकीत  सर्व राजकीय पक्ष प्रमुखांबरोबर केंद्र सरकारच्या  धोरणाला संमती दिली होती, असे घूमजाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबूक पेजवरुन केले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील प्रचारसभेत बोलताना पवार यांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये हल्ला करुन दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त  करण्याचा सल्ला  मीच केंद्र सरकारला दिला होता, असे विधान प्रसारमाध्यमांतून   प्रसिद्ध झाले होते. यावर पवार यांनी खुलासा केला आहे.

पवार आपल्या फेसबूक पेजवर म्हणतात की, पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता. काल मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला.परंतु तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे. मी सदर बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्ष प्रमुखांची संमती होती…..

ते पुढे म्हणतात…..भारतीय सैन्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिर मधील अतिरेक्यांच्या तळांवर  केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले याची चर्चा व्हायला नको. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये, असे माझे मत आहे.