…त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही – नितीन गडकरी

0
713

नागपूर, दि. २८ (पीसीबी) – जातीपातीचे राजकारण करून काही लोकांकडून भाजपची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आमचा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट करून मुख्यमंत्री बदलांच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

नागपुरात आज (शनिवार) एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी गडकरी आले होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी  महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदल होणार का? असा प्रश्न केला असता गडकरी यांनी याबाबतच्या चर्चा निराधार असल्याचे सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात आंदोलनामुळे तणावाचे वातावरण आहे.  त्यातच आंदोलन नीट हाताळता न आल्याने मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा भाजपमध्येच रंगल्या आहेत, असे  विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या काही  नेत्यांनी मुख्यमंत्री बदलण्याचे वृत्त ही निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते. यानंतर  गडकरी यांनी या याबाबतच्या चर्चा निराधार असल्याचे म्हटले आहे.