Maharashtra

…त्यामुळे तो गैरव्यवहार म्हणता येणार नाही; खडसेंकडून फडणवीस यांची पाठराखण

By PCB Author

December 24, 2019

जळगाव,दि.२४(पीसीबी) – ६५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ठेवला जात असला तरी त्या खर्चाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र अद्याप सादर होणे बाकी आहे. त्यामुळे तो गैरव्यवहार म्हणता येणार नाही, असा दावा करीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांची पाठराखण केली आहे. मुक्ताईनगर येथील निवासस्थानी खडसे पत्रकारांशी संवाद साधला.

कॅगचे परीक्षण ही दरवर्षी निरंतर होणारी प्रक्रिया आहे. हा विषय काही फक्त फडणवीस सरकारपुरता मर्यादित नाही. काँग्रेसच्या काळातही असे प्राथमिक अहवाल आले आहेत. सरकारने केलेल्या खर्चाबाबत उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. जर फडणवीस सरकारने ६५ हजार कोटी रुपयांच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर केली तर त्यात गैरव्यवहार झाल्याचे म्हणता येणार नाही. परंतु, अद्याप त्यांनी ही प्रमाणपत्रे सादर केली नसल्याने लेखापरीक्षकांनी ठपका ठेवला असल्याचे खडसे यांनी निदर्शनास आणून दिले.

महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. या कर्जमाफीचे निकष काय असतील, हे माहिती नसल्याने कर्जमाफीच्या मुद्दय़ावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. आपल्या पक्षांतराच्या बातम्या चुकीच्या असून तसा निर्णय झाला नसल्याचे सांगत त्यांनी त्याबाबत अधिक बोलणे टाळले.