मुंबई, दि. १२ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याआधी उत्तर भारतीय समाजाची माफी मागावी. त्यानंतरच उत्तर भारतीय समाज त्यांना स्वीकारेल, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, गेले काही वर्षे मनसेने ज्या पद्धतीने उत्तर भारतीयांना वागणूक दिली, मारझोड केली, त्याबद्दल माफी मागावी, असे निरुपम म्हणाले. उत्तर भारतीयांशी संवाद साधण्याआधी आमच्याकडून चुका झाल्या, असे राज ठाकरेंनी सांगावे. आपली चूक मान्य करावी. त्यानंतर उत्तर भारतीय समाजाशी संबंध जोडावेत. उत्तर भारतीय समाजही राज ठाकरे यांना मोठ्या मनाने स्वीकारेल, असेही निरुपम म्हणाले.
दरम्यान, येत्या २ डिसेंबर रोजी मुंबईतील कांदिवलीतील बुराभाई हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी उत्तर भारतीय महापंचायत संघाने राज ठाकरे यांना १२ ऑक्टोबर रोजी आमंत्रण दिले आहे. ते त्यांनी स्वीकारले आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत.