“ते रोज काही तरी आरोप करणार, त्यावर रोज काय बोलणार?”

0
411

मुंबई, दि. २० (पीसीबी) : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सकाळपासून ठाकरे सरकारच्या नेते-मंत्र्यांच्याविरोधात आरोपांचा धडाका लावला. अगदी सकाळी सकाळी त्यांनी कराडच्या विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्या कथित 100 कोटींच्या घोटाळ्याचा पुनरुच्चार केला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अलिबागमधील 19 बंगल्याची आणि अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करणार अ्सल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. एकंदरित सोमय्यांनी आज दुपारपर्यंत ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. या सगळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी एका वाक्यात सोमय्यांचा निकाल लावला.

सोमय्या यांनी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कराडमध्ये पत्रकार परिषद घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडून त्यांना घायाळ केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनाही सोडलं नाही. तसंच फक्त सेना आणि राष्ट्रवादीच रडारवर नसल्याचं सांगत लवकरच काँग्रसच्या दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

आज दुपारी अजित पवार यांना सोमय्यांच्या या आरोपनाम्यावर टीव्ही 9 च्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी एका वाक्यात सोमय्या प्रकरणाचा निकाल लावला. ते रोज काही तरी आरोप करणार, त्यावर रोज काय बोलणार, अशा शब्दात त्यांनी सोमय्यांवर निशाणा साधला. तसंच ही प्रतिक्रिया देताना त्यांनी सोमय्यांयं नाव न घेता त्यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला अजित पवार सोमय्या प्रकरणावर बोलण्यास तयार नव्हते. अगदी त्यांनी प्रसारमाध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी एका वाक्यात त्यांनी सोमय्या यांच्या आरोपनाम्याचा निकाल लावला. . ते रोज काही तरी आरोप करणार, त्यावर रोज काय बोलणार, असं अजित पवार म्हणाले.

येत्या गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार असून 27 तारखेला उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा घोटाळ्यांची पाहणी करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाहणी करण्यास जाणार असून अडवून दाखवा, असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं आहे.

हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरकडे निघाले होते. पण सकाळीच त्यांना कराड येथे पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. ठाकरे कुटुंबाकडे 19 बंगले आहेत. हे बंगले कुठून आले? उद्धव ठाकरे यांनी पत्नीच्या नावे बंगले घेतले आहेत. त्यामुळे सोमवारी अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बंगल्याची पाहणी करणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.

मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे, तिथेही असाच घोटाळा आहे. 30 तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर विकत घेतला, त्याचीही मी पाहणी करणार आहे. मला रोखणार आहे का, रोखणार असेल तर रोखा?, असंही किरीट सोमय्या म्हणाले.