नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते तारिक अन्वर काँग्रेसमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्यावेळी केलेल्या चुकीची मला जाणीव झाली आहे. काँग्रेस हा आमचा स्वाभाविक मित्र आहे, असे त्यांनी सांगून राजीमाम्यावर आता फेरविचार केला जाणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल खरेदी व्यवहारप्रकरणी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास होत असेल, तर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण का दिले नाही, असा सवाल खासदार तारिक अन्वर यांनी केला आहे.तर पवारांच्या वक्तव्यावर नाराज होऊन त्यांनी पक्ष सदस्यत्व आणि खासदारकीचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.
वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे, असे वाटत असते, तर पवारांनी तेव्हाच स्पष्टीकरण द्यायला हवे होते. या सर्व बातम्या पाहिल्यानंतर २४ तास वाट पाहिली, कारण पवार स्पष्टीकरण देतील, असे वाटले होते. मात्र, त्यांचे कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. त्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला , असे तारिक अन्वर यांनी सांगितले.