Maharashtra

तारापूर एमआयडीसीत वायूगळतीमुळे तीन कामगारांचा मृत्यू; उपचारासाठी गेलेल्या डॉक्टरलाही वायुची बाधा

By PCB Author

May 13, 2019

पालघर, दि. १३ (पीसीबी)- पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) स्क्वायर केमिकल या कंपनीत वायुगळती होऊन तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारखाना व्यवस्थापक प्रभाकर खडसे (वय ५९), रघुनाथ गोराई (वय ५०), दत्तात्रेय घुले (वय २५) अशी या तिनही कामगारांची नावे आहेत.

तिघांचेही मृतदेह बोईसर येथील तूंगा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणीसाठी गेलेल्या डॉक्टरांनादेखील या वायुची बाधा झाली. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान दूर्घटना घडून पाच तास उलटले असले तरी सदर कंपनीचे मालक कामगारांची विचारपूस करण्यास न आल्याने तुंगा रुग्णालयाबाहेर इतर कामगारांनी आणि मृत कामगारांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला.

दरम्यान, रुग्णालयाबाहेर काही काळ पोलीस आणि मृतांचे नातेवाईक यांच्यात बाचाबाचीदेखील झाली. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने कामगारांना नाहक जीव गमवावे लागत आहेत. परंतु कंपनी मालकांवर कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगत मृतांच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.