मुंबई, दि. ११ (पीसीबी) – ‘शोले’ या चित्रपटाचा रिमेक झाल्यास त्यात कोणत्या राजकारणी व्यक्तीला कोणती भूमिका देणार, असा मिश्किल प्रश्न अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना केला. यावर उत्तर देताना आठवले म्हणाले की, मी अमिताभ बच्चन यांची जयची भूमिका घेईन, तर उद्धव ठाकरेंना धर्मेंद्र यांची विरूची भूमिका दिली असती. तर शरद पवार यांनी गब्बर सिंगची भूमिका साकारली असती.
मकरंद अनासपूरे सूत्रसंचालन करत असलेला ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’या चॅट शो मध्ये आठवले यांनी हजेरी लावत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील माहीत नसलेल्या गोष्टी प्रेक्षकांसमोर सांगितल्या. या कार्यक्रमात गायक आनंद शिंदेही हजेरी लावणार आहेत. या दोघांनी मकरंद अनासपुरेशी दिलखुलास गप्पा मारल्या आहे.
रामदास आठवले हे कवी आहेत हे सर्वश्रुत आहे. या कविता कशा सुचतात आणि त्याची सुरुवात कुठून झाली याबद्दल आठवलेंनी कार्यक्रमात सांगितले आहे. आठवले आणि आनंद शिंदे यांनी बेधडक आणि खुसखुशीत पद्धतीने दिलेल्या उत्तरांमुळे हा कार्यक्रम विशेष ठरणार आहे.