उस्मानाबाद, दि. १६ (पीसीबी) – भावाच्या आत्महत्येच्या घटनाला चार दिवस झाले. तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. पोलीस अधीक्षकांनाही निवेदन दिले आहे. पण, निवडणूक सर्वांना महत्वाची वाटत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणि प्रशासनाने कारवाई केली नाही, तर भावाच्या अस्थी मातोश्रीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार, असा इशारा उस्मानाबादमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
याबाबत राज ढवळे म्हणाले की, माझ्या भावाच्या आत्महत्येप्रकऱणी पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवला नाही. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवण्याचा सल्ला नातेवाईकांनी दिला होता. मात्र, सध्या निवडणुका सुरू असल्यामुळे अधिकाऱ्यांना त्रास नको, म्हणून आम्ही सबूरीने घेतले.
गेले चार दिवस पोलीस ठाण्यामध्ये चकरा मारूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. येत्या काही दिवसांमध्ये कोणतीच कारवाई झाली नाही, तर भावाच्या अस्थी पोलीस ठाण्यामध्ये विसर्जित करण्यात येतील. तसेच अस्थी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात येतील, असा इशाराच त्यांनी दिला आहे.