सुरत, दि. १५ (पीसीबी) – पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे, अन्यथा या देशाचे तुकडे होतील, असा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला. तसेच, जर पाकिस्तानी नागरिकांनी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रय़त्न केला, तर भारतीय लष्कर त्यांना परत जाऊ देणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
गुजरातमधील सुरतमध्ये १२२ शहिदांच्या कुटुंबीयांचा राजनाथ सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पीओकेमधील मुझफ्फराबादमध्ये बोलताना जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत पाकिस्तानी नागरिकांनी नियंत्रण रेषेकडे कूच करु नये, असे म्हटले होते. यावर राजनाथ यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
राजनाथ पुढे म्हणाले की, पाकिस्तान त्यांच्या देशातील अल्पसंख्यांकांना सुरक्षा पुरवण्यात असमर्थ आहे आणि ते मानवाधिकारांच्या बाता मारतात. भारतातील अल्पसंख्याक सुरक्षित होते, आहेत आणि भविष्यातही राहतील. परंतु पाकिस्तानमध्ये शीख, बौद्ध व इतरांचे मानवी हक्क पायदळी तुडवण्याच्या घटना वाढल्या आहेत, असा आरोप राजनाथ यांनी केला.