‘…तर त्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. हे शेतकरी आंदोलनास बदनाम करण्याचं षडयंत्र होतं’

0
374

नवी दिल्ली, दि.२८ (पीसीबी) : भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिल्लीमधील ट्रॅक्टर रॅली प्रकरणा संदर्भात वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हंटल आहे कि, “दिल्लीमधील ट्रॅक्टर रॅली बरीच यशस्वी ठरली. जर कोणती घटना घडली आहे, तर त्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. कुणी लाल किल्ल्यावर पोहचतं आणि पोलिसांची एक गोळी देखील चालत नाही. हे शेतकरी आंदोलनास बदनाम करण्याचं षडयंत्र होतं. शेतकरी आंदोलन सुरूच राहील.”

दरम्यान, प्रजासत्ताकदिनी ‘ट्रॅक्टर मोर्चा’ला हिंसक वळण लागल्याने शेतकरी आंदोलनाला तडा गेला आहे. दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली असून, शेतकऱ्यांचा १ फेब्रुवारीचा संसदेवरील नियोजित मोर्चाही रद्द करण्यात आलेला आहे.

तसेच, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आता फूट पडल्याचे समोर आलं आहे. भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघानं आपलं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही. एम. सिंग आणि ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी बुधवारी याची घोषणा केली आहे.

“हिंसाचाराद्वारे शेतकरी आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न करणारे लोक कोण आहेत? त्यांना आम्ही ओळखतो, त्यांची ओळख पटलेली आहे. हे सर्वजण राजकीय पक्षाचे लोक असून आंदोलनाला बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे,” असं राकेश टिकैत या अगोदर म्हणाले होते.

दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला आहे. तर, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील दीप सिद्धू हा भाजपा कार्यकर्ता असून, त्याचे पंतप्रधानांबरोबर फोटो असल्याचेही म्हटले आहे.

“दीप सिद्धू हा शीख नसून तो भाजपाचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधानांसोबत त्याचा फोटो देखील आहे. ही शेतकर्‍यांची चळवळ आहे आणि तशीच राहील. काही लोकांनी त्वरित हे ठिकाण सोडले पाहिजे – ज्यांनी बॅरिकेडिंग तोडली ते कधीच आंदोलनाचा भाग होणार नाहीत.” असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी काल सांगितलं होतं