Maharashtra

..तर जनता लोकसभा निवडणुकीतही भाजपला धडा शिकवेल – अण्णा हजारे  

By PCB Author

December 12, 2018

अहमदनगर,  दि. १२ (पीसीबी) – पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा  निकाल म्हणजे  मोदी सरकारला दिलेला  इशारा आहे. त्यामुळे मोदींनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, तर नाराज जनता लोकसभा निवडणुकीतही भाजपला धडा शिकवेल’, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी  म्हटले आहे.   

पत्रकारांशी बोलतना हजारे म्हणाले की, भाजपने सत्तेवर येताना  अनेक आश्वासने आणि स्वप्ने दाखविली होती.  मात्र, या आश्वासनांचा सरकारला आता  विसर पडला आहे.  मात्र, जनता ही आश्वासने  विसरलेली नाही. पाच राज्यांच्या निवडणुकीतून  सरकारचा खोटारडेपणा समोर आला आहे.  त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी सरकारला जनतेने दिलेला हा इशाराच आहे, असे हजारे यांनी म्हटले आहे.

नामांतर, राम मंदिरासारखे मुद्दे या निवडणुकीत लोकांना रुचले नाहीत, असे सांगून ‘देव मंदिरात नव्हे, तर दु:खी, पीडित लोकांमध्ये राहतो, अशी संतांची शिकवण आहे. त्यावर आपला विश्वास आहे. त्यामुळे आपण मंदिरात राहत असलो, तरी देवाचा शोध गरिबांमध्ये घेतो. पुतळे आणि मूर्तींची उंची वाढविण्यापेक्षा विचारांची उंची वाढविणे आवश्यक आहे, असे हजारे म्हणाले.