Maharashtra

…तर एखाद्या नेत्याला रॉकेटला बांधून पाठवले असते – देवेंद्र फडणवीस

By PCB Author

April 16, 2019

अहमदनगर, दि. १६ (पीसीबी) – कोणी कितीही पोपटपंची केली तरी तिकडे लक्ष देऊ नका. शेवटी कामे भाजपचे सरकारच करणार आहे. ही निवडणूक देशाच्या अस्मितेची आहे. त्यामुळे बाकी गोष्टींकडे लक्ष न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताकद द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी केले.

वाळकी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांत मी जे प्रश्न सोडविले, ते सर्व पंचवीस वर्षे जुने होते. नगरच्या साकळाई पाणी योजनेचा प्रश्नही पंचवीस वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, आता विधानसभा निवडणुकीच्या आत तो सोडविला जाईल. नगर जिल्ह्यातील पाणी प्रश्नाचे अभ्यासक आणि अनेक योजना मार्गी लावलेले खासदार बाळासाहेब विखे यांची ओळख ‘वॉटर मॅन’ अशी होती. आता त्यांचा नातू डॉ. सुजय विखे निवडणूक लढवित आहे, त्यांचीही अशीच ओळख व्हावी’

…तर एखाद्या नेत्याला रॉकेटला बांधून पाठवले असते!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट यावेळीही आहे, पण ती सामान्य माणसांत आहे, त्यामुळे ती विरोधकांना दिसत नाही. पूर्वी देशाच्या नेतृत्वात कणखरपणा नव्हता, तो आता आला आहे. त्यामुळे आपण दहशतवादी हल्ल्याचा केवळ निषेध नव्हे तर सर्जिकल स्ट्राइक करू शकलो. काँग्रेस-राष्ट्रवादी सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागतील असे आधीच कळले असते तर त्यांचा एखादा नेता रॉकेटला बांधून तिकडे पाठविला असता, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. सैन्याचा विशेषाधिकार काढणे आणि देशद्रोहाचे कलम काढून टाकणे, हा निवडणुकीचा जाहीरनामा असूच कसा शकतो. ही निवडणूक विकास, सुरक्षा आणि आपल्या देशाच्या अस्मितेची आहे. त्यामुळे प्रत्येकाने पोपटपंचीकडे दुर्लक्ष करून विचारपूर्वक मतदान करण्याची गरज आहे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.