नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – लोकसभा निकालानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास आम्ही पंतप्रधानपदही सोडायला तयार आहोत. आघाडी सरकारमध्ये आम्हाला पंतप्रधानपद नाही मिळाले, तरी काहीच अडचण नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.
आझाद म्हणाले की, काँग्रेसच्या बाजूने सर्व मित्र पक्ष उभे राहत असतील, तर आम्ही देशाचे नेतृत्व करायला तयार आहोत, हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. रालोआ सरकारला सत्तेपासून दूर ठेवणे हेच आमचे लक्ष्य राहिले आहे. त्यामुळे आम्हाला बहुमताचा निर्णय मान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
आम्हाला पंतप्रधानपदाची ऑफर दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही त्यावर काहीच भाष्य करणार नाही, असेही आझाद यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विरोधकांना विश्वास वाटत असेल, तर त्यांनी त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला दिले आहे.