मुंबई, दि. १७ (पीसीबी) – डान्सबार बंदी उठविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डील केली आहे, याकामी बार मालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये शायना एनसी यांनी मध्यस्थी केली , असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज (गुरूवार) येथे पत्रकार परिषदेत केला.
बार मालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये डील झाल्यानेच सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू भक्कमपणे मांडली नाही. आघाडी सरकार आले, तर राज्यात पुन्हा डान्सबार बंदी लागू केली जाईल, असे मलिक यावेळी म्हणाले. सरकारने डान्सबारबंदीबाबत बाजू योग्य पद्धतीने मांडली नसल्याने डान्सबारला न्यायालयाने परवानगी दिली, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
यावेळी नवाब मलिक यांनी डोंबिवली शस्त्र प्रकरणावरूनही भाजपवर टीका केली. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे आरोपीची पाठराखण करत आहेत. पोलिसांनी चव्हाण यांच्यामुळेच धनंजय कुलकर्णींचा रिमांड मागितला नाही असाही आरोप मलिक यांनी केला. डोंबिवलीत सापडलेला शस्त्रसाठा विदेशी बनावटीचा आहे. हा साठा भाजपने आणला आहे, ही तस्करी आहे का? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, असे मलिक म्हणाले.