मुंबई, दि. १९ (पीसीबी) – विरोधी पक्षनेता असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडला. पण त्यांनाच भाजपने फोडले. विखे पाटलांनी ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ म्हणत हिणवले, मात्र, तेच विखे आज ‘ठगांमध्ये’ जाऊन कधी बसले, तेच आम्हाला कळले नाही, असा टोला राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज (बुधवार) येथे लगावला.
राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना अजितदादा पवार म्हणाले की, विनोद तावडे यांनी शिक्षण मंत्री असताना ही नवीन पद्धत आणली. त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी बाजूला केले आणि शेलारांना शिक्षण मंत्री केले आहे का? असा सवाल करून शिक्षण मंत्री शेलार त्यात दुरुस्ती करतील, असे पवार म्हणाले.
राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना वाहिली. मात्र, महाराष्ट्रातील शहिदांचे, त्यांच्या कुटुबियांचे प्रश्न तसेच आहेत. राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली मात्र आज काही लोक नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करत आहे. हे आपल्या देशाला शोभणारे नाही. हे विचार कुठे तरी थांबवले पाहिजे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.