टेस्टिंग वाढवा अन्यथा संक्रमण वाढेल – देवेंद्र फडणवीस

0
232

नवी मुंबई, दि. ४ (पीसीबी) : कोरोना टेस्टिंगचं प्रमाण वाढलं पाहिजे. टेस्टिंग वाढवलं नाही तर कोरोनाचं संक्रमण वाढत जाईल. सध्या अधिक व्हेंटिलेटरची गरज आहे. सरकारची व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया मंद गतीने सुरु आहे. एमएमआर रिजनमध्ये टेस्टिंगची व्यवस्था आणि आयसोलेशन तसेच उपचाराची व्यवस्था वाढवावी लागेल, कारण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आणि पनवेलचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, डबलिंग रेट 24 दिवसांवर गेला असला तरी संख्या वाढत चालली आहे. आता रुग्णांना शासकीय रुग्णालयात जागा उरली नाहीय, त्यामुळे खासगी रुग्णालया जावं लागतं आणि ते न परवडणारं आहे, असं ते म्हणाले. सामान्य रुग्णांसाठी कोणतंही रुग्णालय उरलं नाही. काम पटापट झाली पाहिजेत, पण ती कामं वेगानं होत नाहीत, असंही फडणवीस म्हणाले. तसंच वाशी बाजार समितीमध्ये रॅपिड टेस्टींग झाली पाहिजे. थर्मल टेस्टींग वाढलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

आयुक्तांच्या बदल्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, आयुक्तांच्या बदल्या करताना पालकमंत्र्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे, अशी टीका त्यांनी केली.

मंत्र्यांच्या गाडी खर्चाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, आता गाडी ही काय प्राथमिकता असू शकत नाही. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीत कडक धोरण स्वीकारले पाहिजे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आपल्या प्रदीर्घ अनुभवातून काही सूचना करत असतील. आम्हालाही ते सूचना करायचे. मुख्यमंत्र्यांनी आता ठरवायचे आहे की सूचनांची अमलबजावणी कशी करायची आहे, असं फडणवीस म्हणाले .

भाजप कार्यकारिणीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. कार्यकारणीत प्रत्येकाला न्याय देण्याच्या प्रयत्न केला आहे. ज्या पद्धतीची कार्यकारणी असते तशीच तयार केली आहे. काहींना केंद्रांत संधी द्यायची आहे, त्यातलं एक नाव आपल्यासमोर आहे, असं ते म्हणाले.

राज्य सरकारकडून महापालिकांना कोरोनाचा सामना करण्यासाठी काहीही पैशांची मदत करण्यात आली नाही, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. आरोग्य व्यवस्था जरी सरकारची जबाबदारी असेल तरी महापालिकांवर बोजा आहे. काही मोठ्या महापालिका सोडल्या तर अनेक महापालिकांची कोविड-19 चा सामना करण्याची क्षमता नाही. सरकार आणि महापालिकांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.