जुलै महिन्यात कोरोनाचा उद्रेक

0
423

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – जगभर कोरोनाचे थैमान सुरू असताना भारतातली परिस्थिती फारशी वाईट दिसत नाही. जानेवारीच्या अखेरीस भारतामध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर आतापर्यंत भारतात पावणे दोन लाखांपर्यंत कोरोना रुग्ण आढळले आणि आतापर्यंत सुमारे 4,000 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात परिस्थिती आटोक्यात आहे. जुलै महिन्यात कोरोनाचा उद्रेक होईल असे तज्ञ सांगत असले तरी रुग्णांचा रिकव्हरी रेट सुमारे 40%. आहे ही समाधानाची बाब आहे.

जुलैमध्ये हा संसर्ग टोक (Peak) गाठण्याचा अंदाज आहे. या काळात संसर्ग वाढल्याने रुग्णसंख्या वाढेल आणि हॉस्पिटल्समध्ये जागा नसल्याने वा उपचार उशीरा मिळाल्याने, वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने वा बरं होण्यासाठी वैद्यकीय मदत न मिळाल्याने जीव वाचवण्याजोग्या अनेकांचा मृत्यू होण्याची भीती आहे.
22 मे पर्यंत भारतामध्ये करण्यात आलेल्या एकूण चाचण्यांपैकी 4% जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर संसर्ग झालेल्यांपैकी 3% जणांचा मृत्यू झालाय. कोरोना व्हायरसचा ‘डबलिंग रेट’ म्हणजेच रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर आहे 13 दिवस. कोरोना व्हायरसच्या साथीचा भयंकर विळखा पडलेल्या इतर देशांच्या तुलनेत ही आकडेवारी बऱ्यापैकी कमी आहे. पण जगाप्रमाणेच भारतात अनेक हॉटस्पॉट्स आणि संसर्गाची केंद्रं आहेत.
भारतातल्या एकूण अॅक्टिव्ह केसेसपैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांत आहेत. त्यातही 60% पेक्षा जास्त रुग्ण हे पाच शहरांमध्ये आहेत. यामध्ये मुंबई, दिल्ली आणि अहमदाबादचा समावेश असल्याचं अधिकृत आकडेवारी सांगते. ज्यांचा या कोरोना मुळे मृत्यू झाला त्यांच्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते आणि यातल्या अनेकांना इतर विकार होते. वयाने ज्येष्ठ व्यक्तींना या आजाराचा जास्त धोका असल्याचं आंतरराष्ट्रीय आकडेवारीतूनही आढळलं आहे.
भारतातल्या लॉकडाऊनला आता दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेलाय. अधिकृत आकडेवारीनुसार या लॉकडाऊनमुळे साधारण 37,000 ते 78,000 लोकांचा जीव वाचवण्यात आला. हार्वर्ड डेटा सायन्स रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनानुसार आठ आठवड्यांच्या लॉकडाऊनमुळे साधारण 20 लाख केसेस रोखता आल्या, मृत्यूदर 3% वरॉ रोतॉआल्याने 60,000 मृत्यू टाळता आले.
“संसर्ग काही भागांपुरता मर्यादित राहिलाय. यामुळे देखील इतर भागांतले व्यवहार खुले ही साथ शहरांपुरती मर्यादित आहे,” कोरोना साठीच्या मेडिकल इमर्जन्सी मॅनेजमेंटचे प्रमुख व्ही. के. पॉल सांगतात.
पण या दाव्यांबद्दल पुरेशी स्पष्टता नाही. संसर्गाच्या बाबतीत आता भारत जगभरातल्या सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या पहिल्या 10 देशांच्या यादीत आहे. तर नवीन रुग्णांच्या संख्येच्याबाबत भारत पहिल्या 5 देशांमध्ये आहे. 25 मार्चला पहिला कठोर लॉकडाऊन लावण्यात आला तेव्हा देशात कोरोना व्हायरसचे 536 रुग्ण होते. पण आता संसर्गाचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. संसर्गाचा वाढीचा दर हा चाचण्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. एप्रिलपासून चाचणी करण्याचं – टेस्टिंगचं प्रमाण दुपटीने वाढलं असलं तरी त्यासोबतच रुग्णसंख्याही अनेकपटींनी वाढलेली आहे.

चाचण्यांची संख्या वाढल्याने नोंदणी होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याची शक्यता असल्याचं साथीच्या रोगांच्या तज्ज्ञांचं (एपिडेमिलॉजिस्ट – Epidemiologist) म्हणणं आहे. भारतामध्ये गेल्या आठवड्यात एका दिवशी 1,00, 000 नमुने तपासण्यात आले. या चाचण्या करताना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पण कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्या लोकांचाही समावेश केला जातोय. असं असूनही लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात कमी चाचण्या करणाऱ्या देशांत भारताची गणना होते. भारतामध्ये दर 10 लाख लोकांमागे 2,198 चाचण्या केल्या जातात.

शहरांमध्ये संसर्ग आणखीन वाढणार –
मार्च महिन्याच्या अखेरीस घाई घाईने लॉकडाऊन लावण्यात आल्याने असंघटित क्षेत्रातल्या लाखोंचा शहरांतला रोजगार गेला आणि जथ्थेच्या जथ्थे गावाच्या दिशेने निघाले. सुरुवातीला पायी आणि मग नंतर ट्रेनने. गेल्या तीन आठवड्यांत 6 पेक्षा जास्त राज्यांतल्या सुमारे 40 लाख मजुरांनी आतापर्यंत रेल्वेने प्रवास करत गाव गाठलंय. यामुळे शहरांमधून गावांमध्ये संसर्ग पोहोचल्याचं सांगणारे अनेक पुरावे आढळले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला लॉकडाऊन गोंधळातच काहीसा शिथील करण्यात आला. यामुळे शहरांमध्ये संसर्ग आणखीन वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

तरूण लोकसंख्येला होणारं संसर्गाचं सौम्य स्वरुप आणि मोठ्या प्रमाणातल्या बाधितांना कोणतीही लक्षणं आढळणं ही वाढणारा संसर्ग आणि सध्यातरी कमी असणारा मृत्यूदर यामागची कारणं आहेत. भारत सरकारच्या नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत सांगतात, ” मृत्यूचा दर कमी करणं आणि बरं होण्याचा दर वाढवणं, यावर लक्ष केंद्रीत करायला हवं.” पण संसर्गाचं प्रमाण वाढतंच चाललंय. “येत्या काही आठवड्यांच्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होईल,” एका आघाडीच्या व्हायरॉलॉजिस्टनी (Virologist – साथरोगतज्ज्ञ) सांगितले आहे. कोरोना चे रुग्ण येण्याचे प्रमाण सतत वाढत असल्याचं दिल्ली आणि मुंबईतले डॉक्टर्स सांगतात. हॉस्पिटलमधल्या बेड्सचा तुटवडा, क्रिटिकल केअरसाठीच्या मर्यादित सुविधा या सगळ्याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली.