“जुना इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम मे सब नंगे”; आव्हाडांकडून क्रांती रेडकरला सूचक इशारा

0
353

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवलीय. समीर वानखेडे यांचा निकाहनामाच आज मलिक यांनी दाखवला आहे. अशावेळी समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. मलिक यांच्याकडून पैसा आणि सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचा गंभीर आरोप क्रांती रेडकरने केलाय. क्रांती रेडकरच्या प्रत्युत्तरानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तिने सांभाळून बोलावं असा सल्ला दिलाय. त्याचबरोबर जुना इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम मे सब नंगे, असा सूचक इशाराही आव्हाड यांनी दिलाय.

‘क्रुझवर 4 हजार लोक होते. मात्र, त्यातील फक्त 6 जणांनाच पकडलं, हे काही कळलं नाही. मी पहचान कौन? हे ट्वीट केलं आणि नंतर डिलीट केलं. कारण मला जे लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं, ते पोहोचलं, म्हणून डिलीट केलं. क्रांती रेडकरांनी थोडं सांभाळून बोलावं. मागचा इतिहास जर काढला तर लक्षात येईल की हमाम मे संब नंगे. सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केलं की समीर वानखेडे यांचं सर्टिफिकेट बोगस आहे. त्यामुळे सर्टिफिकेटबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट झालीय, त्यांचं अभिनंदन’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“निकाहनाम्याचे पेपर सासूबाईंनी बनवले होते, ज्या मुस्लीम होत्या. मात्र माझा नवरा आणि सासऱ्यांशी त्याचा काहीही संबंध नाही. समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या तेव्हाही हिंदू होते, आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत त्यांचं लग्न झालं, त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत दोन वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्ती लग्न करतात. त्यांनी धर्म लपवल्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. त्यावर नवरा-बायको दोघांच्या सह्या आहेत. मी हिंदू असल्याने इस्लाम धर्माची तेवढी मला माहिती नाही. पण मौलानांनी संविधानानुसार पाहिलं तर समीर तेव्हाही हिंदू होते. त्यांनी माहिती घ्यायला हवी होती” असं क्रांतीने म्हटलंय. “माझा लढा हा धर्माविरोधात नाही तर त्यांनी कशा चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलीय, हे मला सगळ्यांसमोर आणायचंय. खोटा जातीचा दाखला देऊन त्यांनी नोकरी मिळवली, हा माझा स्पष्ट आरोप आहे. एका अनुसूचित प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्याची नोकरी त्यांनी हिसकावून घेतली. गरिब वंचित व्यक्ती झोपडीत राहून युपीएससीची तयारी करत होता. त्याची नोकरी समीर वानखेडेने हिसकावून घेतली आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. अशा बोगसगिरीविरोधात 3 ते 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की त्यांची नोकरी नक्की जाईल.”