जीवनावश्यक वस्तू,भाजीपाला,कांदे व बटाटे ज्यादा दराने विक्री करणाऱ्यावर होणार गुन्हा दाखल

0
1270

 

जालना, दि.२६ (पीसीबी) – कोणीही जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व कांदे बटाटे जादा दराने विक्री करू नये. अन्यथा सदर व्यापाऱ्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम १९८० मधील तरतुदीनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधीत व्यापारी,दुकानदार , व्यक्ती व संस्था यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

व जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने विक्री करत असलेबाबत (विशेषतः भाजीपाला, कांदे , बटाटे) याबाबत तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. सर्व घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी आपले जीवनावश्यक वस्तू व किराणा मालाचे दुकान तात्काळ उघडे ठेवावेत व गरजू ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू योग्य दराने पुरवठा करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिले आहेत.

सर्व तहसीलदार यांनी आपल्या तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंचे घाऊक व किरकोळ दुकाने चालू/ उघडी आहेत का? याची खात्री करावी तसेच कोणतीही जीवनावश्यक वस्तू अथवा भाजीपाला, कांदे, बटाटा यांची चढ्या दराने विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिल्या आहेत.