जिंकलेल्या ४ जागाही राखता येणे कठीण झाल्याने शरद पवार मैदानात – भाजप  

0
684

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादीला २०१४च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या ४ जागाही राखता येणे कठीण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी ट्विट करुन  केली आहे.

शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह आम्ही त्यांच्याकडे केला. आमच्या विनंतीला मान देऊन ते लोकसभा निवडणूक लढवतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज ( गुरुवारी) मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत दिली.

यावर भंडारी यांनी  ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ४ जागांवर विजयी झाली होती, त्या ४ जागा देखील यंदा राखणे कठीण  असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे स्वतः शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे भंडारी म्हणाले.