बिलासपूर, दि. १२ (पीसीबी) – काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही जामिनावर फिरत आहेत, आज हे दोघे मला प्रामाणिकपणा शिकवत आहेत. नोटाबंदीमुळे त्यांच्या बनावट कंपन्यांना आळा बसल्यामुळे या दोघांना जामिनावर फिरावे लागते आहे. त्यामुळे आधी स्वतः काय केले आहे, ते पाहा, असा खोचक सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
छत्तीसगडमधील दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी बिलासपूरमध्ये मोदी यांनी आज (सोमवार) सभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. मी अनेक वर्षे बिलासपूरमध्ये काम केले. छत्तीसगड हे भारतासाठी धान्याचे कोठार आहे. येथे संत कबीर यांना मानणारे लोक आहेत.
देशातील विरोधकांना अजूनही भाजपाचा सामना कसा करायचा हे समजलेलेच नाही. आम्ही विकासावर भर देतो आहोत. आम्हाला देशातून जातीभेद नष्ट करायचा आहे. तुम्ही सगळेजण या विकासाचे साक्षीदार आहात अशात काँग्रेसला मात्र आमच्यावर टीका करण्यातच रस आहे, असे मोदी म्हणाले.