जातीनिहाय आरक्षणात कोणतेही बदल केले जाणार नाहीत – पंतप्रधान मोदी

0
1530

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सध्याच्या सर्वाधिक  बहुचर्चित  विषयांवर भाष्य केले.  एका वृत्तसंस्थेला दिलेल्या  मुलाखतीत  मोदी यांनी एनआरसी, आरक्षण आणि मॉब लिंचिंग आदी विषयांवर आपले परखड भाष्य केले. ही मुलाखत २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरणार  आहे.

आरक्षणाच्या विषयावर बोलताना मोदी म्हणाले की, जातीनिहाय आरक्षण बदलण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही. आरक्षणात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. याबाबत कोणालाही शंका घेण्याची गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्ने देशाची ताकद आहे.  आम्ही ती पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहोत. सबका साथ, सबका विकास हा आमचा उद्देश आहे. गरीब, पीडित, दलित, मागास, आदिवासी आणि ओबीसी समाजातील लोकांचे हित जपण्यास प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले.

कोणत्याही भारतीय नागरिकाला देश सोडण्याची वेळ येणार नाही. ज्या नागरिकांची नावे यादीत नाहीत, त्यांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली जाईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उत्तर देत मोदी म्हणाले की, ज्या लोकांचा स्वत:वरचा विश्वास उडला आहे, ज्यांना देशातील नागरिकांचे समर्थन नाही, जे देशातील महत्त्वाच्या संस्थांवर विश्वास ठेवत नाहीत, तेच लोक देशाचे तुकडे करण्याच्या गोष्टी करतात.

देशातील बेरोजगारीवर बोलताना मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी एक कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामुळे रोजगार उपलब्ध झाले नाही हे बोलणे आता बंद करायला हवे. याशिवाय विविध केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत या योजनांद्वारे रोजगार उपलब्ध झाले नाही का? असा सवाल मोदींनी उपस्थित केला.

जमावाकडून होणाऱ्या हत्या  दु्र्दैवी आहेत. सर्वांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजात शांतता आणि एकता निर्माण करायला हवी. अशा घटनानांवर आणि अशा मानसिकतेवर आम्ही अनेकदा स्पष्ट शब्दात आमची भूमिका मांडली आहे. त्यामुळे अशा घटनांचे समर्थन होऊ शकत नाही.

भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी केलेली महाआघाडी  फार काळ टिकणार नाही. महाआघाडी वैचारिक समर्थन, जनतेच्या अपेक्षा, विकास, वैचारिक एकतेसाठी नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी या महाआघाडीची स्थापना केली आहे. भाजपच्या लोकप्रियतेबाबत विरोधीपक्ष चिंतीत आहे. त्यामुळे एकट्याने लढण्याची हिंमत विरोधकांमध्ये राहिली नाही, अशी टीका मोदींनी यावेळी विरोधकांवर केली.