जलयुक्त शिवार नाही, ही तर झोलयुक्त शिवार योजना- अशोक चव्हाण

0
737

हिंगोली, दि. २८ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार नाही, तर झोलयुक्त शिवार योजना आहे. ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे झाली, त्याठिकाणी पाणी २-३ मीटर खाली गेले आहे. मग या कामाचे पैसे कुठे गेले? असा सवाल करून हे केवळ प्रसिद्धी करणारे सरकार आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

भाजप सरकार विरोधात काँग्रेसने राज्यात जनसंघर्ष यात्रा काढली आहे. तिसऱ्या टप्प्यात संघर्ष यात्रा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे आली. यावेळी चव्हाण बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-सेना भाऊ-भाऊ आहेत, असे विधान केले होते. यावर ‘भाजप सेना हे भाऊ भाऊ आणि दोघे मिळून महाराष्ट्र लाटून खाऊ’ अशी खिल्ली अशोक चव्हाण यांनी उडवली. भाजप सरकारने नुसतीच फसवी आश्वासने, फसवी कर्जमाफी केली आहे. भाववाढ होऊन महागाई गगनाला भिडली आहे. शेतमालाला हमीभाव नाही, असे चव्हाण यावेळी म्हणाले.