श्रीनगर, दि. १० (पीसीबी) – जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज (रविवारी) पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत ५ दहशतवादी ठार झाले लष्कराच्या जवानांनी परिसराला चारही बाजुनी घेरले आहे. चकमक अद्यापही सुरूच असल्याचे लष्कराकडून सांगण्यात येत आहे.
सुरक्षा दलाला केलम परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लष्कराच्या ९ राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिस आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाच्या जवानांनी केलम गावाला चारही बाजुनी घेरले. त्यानंतर परिसरात शोधमोहिम हाती घेण्यात आली.
यावेळी दोन घरांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला भारताच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यात ५ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान याठिकाणी दोन्ही बाजुनी गोळीबार अद्यापही सुरूच आहे.