जमावाकडून मारहाणीच्या घटना रोखण्याचे गृह मंत्रालयाचे राज्यांना आदेश

0
454

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – महाराष्ट्रासह देशभरात मुलांची चोर करणारी टोळी आल्याच्या   अफवांनी सोशल मीडिया चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात मुले चोरणारे समजून पाच जणांना जमावाने ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे या घटनांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी सतर्क राहण्याचे आणि योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत.

ज्या भागात मुले चोरी होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, अशा ठिकाणांची माहिती संकलित करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्या. तसेच जनतेमध्ये जाऊन त्यांचा गैरसमज दूर करा. तसेच मुलांच्या अपहरणाच्या प्रकरणांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने याबाबत व्हॉट्सअॅपलाही सूचना केल्या होत्या. बेजबाबदार आणि अफवा पसरवणारे संदेश थांबवा. अशा प्रकारच्या संदेशाबाबत व्हॉट्सअॅपला उत्तर देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तर व्हॉट्सअॅपनेही अशा प्रकारच्या संदेशमुळे चिंता व्यक्त केली आहे. असे प्रकार रोखण्यासाठी सरकार, समाज आणि टेक्नोलॉजी कंपनीने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे.