Maharashtra

जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

By PCB Author

February 11, 2019

मुंबई, दि. ११ (पीसीबी) –  महाराष्ट्रात ४८ पैकी ४३ जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ भाजपपाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या (सोमवार) ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर  टीकास्त्र सोडले आहे. पुण्यातील कार्यक्रमात भाजपने ४८ पैकी ४३ जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.  हाच धागा पकडून शिवसेनेने भाजपला  फटकारले  आहे.

सत्तेची धुंदी चढलेल्या भाजपने पाडापाडीची भाषा न करण्याचा सल्लाही अग्रलेखात  देण्यात आला आहे. ‘सत्ता कोणाला नको आहे? राजकारण करणाऱ्या  सगळ्यांनाच ती हवी आहे, पण चोवीस तास त्याच नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील,  अशी  टीका करण्यात आली आहे.