‘जनता काही सांगत असते, त्यावेळेस त्यांचं ऐकायचं असतं’; अजित पवारांनी भास्कर जाधवांना सुनावलं

0
249

मुंबई, दि.२६ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (२६ जुलै) चिपळूण आणि खेडमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. चिपळूण बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून पाहणी केली असता यावेळी एका महिलेनं मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत काही करा पण आम्हाला उभं करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही महिलेचं म्हणणं ऐकून धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा तालिका अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी आरेरावी केल्याचा प्रकार त्यावेळी घडला. त्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना टोला हाणला आहे. पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं.

अजित पवार प्रतिक्रिया देत म्हणाले कि, “आम्ही कुठेही गेलो तर जनता काही सांगत असते. त्यावेळेस त्यांचं ऐकायचं असतं. तिथली परिस्थिती नेमकी काय झालेली आहे. हे मला माहिती नाही. मी पण भास्कर जाधव यांना ओळखतो. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलंय. आम्ही एकत्र मंत्रिमंडळात होतो. त्यांनी असंही स्टेटमेंट केलं आहे की, ते त्यांच्या घरातील नातेवाईक होते. लोकप्रतिनिधी खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री कुठेही गेले तर जनतेचं म्हणणं ऐकून घेणं आमचं कर्तव्य आहे. ते पार पाडलं पाहीजे.”