सांगली, दि. २२ (पीसीबी) – कोल्हापूर सांगलीमध्ये महापूरामुळे सांगलीची बाजरपेठ मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना उभारी देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. तसेच छोट्या व्यापाऱ्यांना ५० हजार रूपयांच्या मर्यादेत मदत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी पंचनामे करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पूरबाधित उद्योजक, लघु उद्योजक, छोटे व्यापारी यांच्या अडचणीवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक घेतली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, विशेष कार्य अधिकारी रविंद्र खेबुडकर, महावितरणच्या संचालिका निता केळकर, दिपक शिंदे (म्हैसाळकर), सांगली, कोल्हापूर येथील उद्योजकांच्या विविध संघटना, कर सल्लागार, टॅक्सी युनियन, औषध व्यावसायिक, पान असोसिएशन, मेकॅनिकल असोसिएशन, रिक्षा युनियन आदि विविध घटकातील संघटनांच्या प्रतिनिधी, व्यापारी, उद्योजक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.