Banner News

छत्रपती संभाजी राजे प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची उडी फसली; शिवसेनेचा `सामना` तून पलटवार

By PCB Author

May 30, 2022

मुंबई दि. ३० (पीसीबी) : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीला शिवसेनेने पाठिंबा न दिल्यामुळे टीकेचे बाण सोडणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची कोंडी झाली. संभाजीराजे छत्रपती प्रकरणात फडणवीसांनी उडी घेतली खरी पण ती फसली, असे मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून मांडण्यात आले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीविषयी देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिकारक मते मांडली. आधी पाठिंबा द्यायचा आणि नंतर तो काढून घ्यायचा, अशा पद्धतीने संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली, असे फडणवीस बोलू लागले आहेत. कोंडी झाली म्हणजे काय हे आधी देवेंद्र फडणवीस यांनी मराठी शब्दकोश पाहून समजून घ्यावे. २०१९ साली ‘मी पुन्हा येईन’, असे सांगणाऱ्या फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही. तेव्हापासून सुरु झालेली स्वत:ची कोंडी त्यांना फोडता आलेली नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. शिवसेनेने संभाजीराजे यांना दिलेला शब्द फिरवला, या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेचाही ‘सामना’तून प्रतिवाद करण्यात आला आहे. पण शब्द द्यायचा आणि नंतर वेळ येताच मोडायचा हे भाजपला चांगले जमते. २०१४ आणि २०१९ साली महाराष्ट्रात जे शब्द फिरवण्याचे खेळ झाले, त्याचा अनुभव गाठिशी असलेले फडणवीस इतरांच्या शब्दमोडीवर बोलतात हे आश्चर्यच आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत भाजप नेतृत्त्वाने दिलेला शब्द कसा मोडला,हे संपूर्ण देश जाणतो. संभाजीराजे छत्रपती यांची शिवसेनेशी चर्चा झाली तेव्हा फडणवीस तिथे हजर नव्हते. शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात घडले ते चार भिंतीतले आहे. शिवसेना आणि संभाजीराजेंचा राजकीय व्यवहार जमला नाही. पण तो भाजपशी तरी जमला का, असा सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे.

राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांनी संभाजीराजे यांना आधी पाठिंबा दिला आणि नंतर घुमजाव केले, असे देवेंद्र फडणवीस सांगतात. पण ही ‘मोदी स्कूल’ची लोणकढी थाप आहे. उलटपक्षी भाजपनेचे संभाजीराजे यांची कोंडी करायला सुरुवात केली होती. संभाजीराजे फडणवीस यांना भेटले आणि पाठिंब्यासाठी विनंती केली. तेव्हा फडणवीस यांनीही संभाजीराजे यांना पाठिंबा जाहीर केला नाही. ‘विचार करु’, ‘वरच्यांना विचारून निर्णय घेऊ’, अशी थातूरमातूर उत्तरे त्यांनी दिली. त्यामुळे सहाव्या जागेसाठी अपक्ष लढू पाहणाऱ्या संभाजीराजेंना भाजपने सापळ्यात अडकवले. हा त्यांचा जुनाच धंदा आहे, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.