‘छत्रपती संभाजी महाराज्यांचे नाव घेऊन नामांतरणाचे राजकारण खेळू नका नाहीतर….’

0
427

मुंबई, दि.०७ (पीसीबी) : राज्यात सध्या सगळीकडे औरंगाबादच्या नामांतराचा विषय चर्चेत आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं अशी मागणी होत असताना काँग्रेसने मात्र यासाठी विरोध दर्शवला आहे. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत आहे. मात्र हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नसल्याची आठवण काँग्रेस करुन देत आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून शिवसेना आणि काँग्रेस नाटक कंपनी असल्याची विनोदी टीका केली जात आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेसाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला स्पष्टपणे विरोध असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी ट्विट करत बाळासाहेब थोरात म्हटलं आहे की, “महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.” 

“माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही”. असं म्हणत त्यांनी बाळासाहेब थोरात यांनी यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कारभारावर नाराजी जाहीर केली. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया,” असंही ते म्हणाले आहेत.