‘चौकीदार चोर है’ विधानाबाबत राहुल गांधींचा माफीनामा

0
515

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘चौकीदार चोर है’  अशी टीकात्मक वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात  दिलगिरी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारात येणाऱ्या विषयांवर ओघात आपण ‘चौकीदार चोर है’ असे  संबंध जोडत शब्द प्रयोग केले, मात्र ते चुकीच्या अर्थाने घेतले गेले, असा खुलासा  राहुल गांधी यांनी  न्यायालयात केला आहे.

‘चौकीदार चोर है हे आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केले आहे’, हे वक्तव्य मी राजकीय प्रचाराच्या ओघात केले आहे. मात्र माझ्या राजकीय विरोधकांनी त्या वक्तव्याचा गैरअर्थ काढलेला आहे. मी हे वक्तव्य जाणूनबुजून, हेतुपुरस्सर केले असल्याची तक्रार त्यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. मात्र तशा प्रकारचे काहीही माझ्या मनात नाही, असे   राहुल गांधी यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

‘चौकीदार चोर है’ या राहुल गांधी याच्या वक्तव्याविरोधात  भाजपच्या नेत्या आणि नवी दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुप्रीम कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता. राहुल यांचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित असल्याचे लेखी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.