Bhosari

चिखलीत किरकोळ कारणावरून एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण

By PCB Author

November 26, 2018

चिखली, दि. २६ (पीसीबी) – लहान मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याने सहा जणांच्या टोळक्याने एका कुटुंबातील चौघांना जबर मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २५) रात्री नऊच्या सुमारास चिखली येथे घडली.

राजाभाऊ महादेव कांबळे (वय ३८, रा. धर्मजराजनगर, चिखली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार निलेश जावळे, नवनाथ खंडागळे (दोघे रा. धर्मजराजनगर, चिखली) यांच्यासह अन्य चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी फिर्यादी कांबळे यांचा मुलगा सुमित यास आरोपींनी किरकोळ कारणाहून हाताने मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी कांबळे गेले असता आरोपींनी त्यांना देखील हाताने मारहाण केली. कांबळे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले असताना एकाने मध्यस्थी करून प्रकरण आपसात मिटवले.  त्यानंतर रविवारी रात्री आरोपींनी कांबळे यांच्या घराजवळ येऊन राडा केला.आरोपी जावळे याने कांबळे यांची कॉलरधरून त्यांना लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. कांबळे यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी सीताबाई, मुलगा सुमित आणि मुलगी तनुजा हे आले असताना आरोपींनी त्यांना देखील हाताने मारहाण केली.

कांबळे यांनी त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करीत तेथून पळ काढला. कांबळे आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर कैलास माळी यांच्या घरात लपून बसले. कांबळे यांना घरात घुसताना आरोपींनी पाहिल्याने त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करून माळी यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच निलेश जावळे याने हातातील गज हवेत फिरवून ‘कोण मायका लाल आम्हाला अडवतो, आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. यावेळी रस्त्यावर शतपावलीसाठी आलेले नागरिक भयभीत होऊन सैरावैरा पळत सुटले. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. चपाईतकर तपास करीत आहेत.