चिंचवड मतदारसंघातील पाच हजार नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कार्डचे वाटप

0
677

पिंपरी, दि. १८  (पीसीबी) – विधवा, अपंग, मागासवर्ग, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम कामगारांसह प्रत्येक वंचिताला सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी संपूर्ण चिंचवड मतदारसंघात जागोजागी केंद्र उघडले आहेत. त्यामार्फत सरकारी योजनांच्या जनजागृतीसह पात्र नागरिकांना शोधून काढून त्यांना लाभ मिळवून दिले जात आहेत. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तब्बल १३ हजार नागरिकांची नोंदणी करून, त्यातील सुमारे ५ हजार नागरिकांना कार्डचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले आहे. आता या नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत करून घेता येणार आहेत. पैसे नसल्याने उपचार करू न शकणाऱ्या रुग्णांना आयुष्मान भारत योजना वरदान ठरणारी आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपापल्या परिसरातील भाजप नगरसेवक तसेच प्रभाग स्वीकृत सदस्यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २३, २७, २९ आणि ३१ मधील नागरिकांना केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत चिंचवड मतदारसंघातील सुमारे १३ हजार नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात त्यातील सुमारे पाच हजार नागरिकांना योजनेसाठी पात्र ठरल्याचे कार्ड देण्यात आले आहेत. पिंपळेगुरव, काळेवाडी, रहाटणी आणि थेरगाव या भागात झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते नागरिकांना आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजप शहर सरचिटणीस अमोल थोरात, नगरसेवक हर्षल ढोरे, अंबरनाथ कांबळे, सागर आंघोळकर, चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभुवन, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, नगरसेविका माई ढोरे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, उषा मुंढे, चंदा लोखंडे, अर्चना बारणे, मनिषा पवार, सविता खुळे, प्रभाग स्वीकृत सदस्य संदिप गाडे, गोपाळ माळेकर, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, काळूराम बारणे, तानाजी बारणे, संजय मरकड, राज तापकीर यांच्यासह त्या त्या भागातील भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “सामान्यांचे जीवनमान उंचावे तसेच गोरगरीबांना त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये चांगले उपचार मिळावेत, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात. परंतु, पुरेशी माहिती नसल्यामुळे तसेच सरकारी कार्यालयांमध्ये येणाऱ्या अनुभवांमुळे सर्वसामान्य व्यक्ती सरकारी योजनांपासून लांब राहणेच पसंत करते. त्यामुळे नागरिकांमध्ये सरकारी योजनांची व्यवस्थित जनजागृती होणे गरजेचे आहे. जनजागृतीसोबतच या योजना त्यांच्या दारांपर्यंत पोहोचवणेही आता काळाजी गरच बनली आहे. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांपासून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्या थेट दारांपर्यंत विविध सरकारी योजना पोहोचवण्याचा उपक्रम सुरू आहे. तसेच या योजनांबाबत मतदारसंघात पुरेशी आणि योग्य जनजागृतीही केली जात आहे. त्याचा चांगला परिणाम झाला असून, शेकडो नागरिकांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसोबतच निराधारांना पेन्शनसह विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. त्याचप्रमाणे मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. कोणत्याही रुग्णांना पैशांअभावी उपचारांपासून वंचित राहावे लागू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचाही लाभ मिळवून दिला जात आहे. दरवर्षी महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातूनही मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. केंद्र सरकारने देशातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आयुष्मान भारत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळतो. याचाच अर्थ या योजनेच्या लाभार्थ्यावर पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या योजनेबाबत चिंचवड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

मतदारसंघातील भाजपचा प्रत्येक नगरसेवक आणि प्रभाग स्वीकृत सदस्याच्या कार्यालयात योजनेच्या नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांनी या कार्यालयात जाऊन आयुष्मान भारत योजनेसाठी नोंदणी करावी. नोंदणीनंतर प्रत्येक नागरिकाला योजनेच्या पात्रतेचे अधिकृत कार्ड दिले जाईल. आतापर्यंत मतदारसंघातील सुमारे १३ हजार नागरिकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. त्यातील सुमारे पाच हजार नागरिकांना योजनेच्या पात्रतेचे कार्ड वाटप करण्यात आले आहे. चिंचवड मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेला एकही नागरिक या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी भाजप कार्यकर्ते काम करत आहेत. नागरिकांनीही स्वतःहून पुढे येत या योजनेत नोंदणी करावी आणि पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले.”